Friday, March 18, 2022

एक दिवस आठवड्याचा

एक दिवस आठवड्याचा!!! 

देऊन तर बघा....

इतके तर आपण करूच शकतो. प्रत्येकाच्या सोयीनुसार, सगुण करा की निर्गुण, करा. साकार( कुठल्याही मूर्ती , प्रतीके, प्रतिमा स्वरुपात) करा की निराकार ( प्रकाश,अवकाश, मन स्वरुपात) करा. षोडषोपचारे ( आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान/अभिषेक, वस्त्र, यद्न्योपवित / मंगळसूत्र, अनुलेपन/ गंध - अक्षता, फुले, धूप, दीप/ आरती, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा / परिक्रमा, विसर्जन.) करा किंवा  मनापासून हात जोडून नमस्कार  करा. आरती म्हणा किंवा ध्यान (meditation) करा. खाऊन पिऊन करा किंवा फराळ करा किंवा  अगदी निर्जळी उपास करून करा. पूर्णपणे श्रद्धा म्हणून करा किंवा शास्त्र शुद्ध माहिती जाणून घेऊन करा. पोथी वाचून करा, कथा ऐकून करा किंवा इंटरनेटवरून समजून घेऊन करा.


इतके आॕपशन इतके पर्याय, इतके मुक्त हस्ते दिलेले स्वातंत्र्य तर कुठल्याही इतर ठिकाणी नाही. सतत वाहता, उत्क्रमित होणारा हा सनातन (/ पुरातन काळापासून चालत आलेला ) धर्म आहे.


बर्याचदा आपण ऐकतो, अमुक तमुक लोक शनिवारी त्यांच्या  प्रार्थनास्थळी जातात. तमुकतमुक शुक्रवारी जातात. तमुक अमुक रविवारी जातात. आपण मात्र कधीही देवळात जात नाही. फारतर सणावाराला, किंवा  सठी-सहामाशी वाढदिवस किंवा परीक्षेच्या आधी गुपचूप देवळात जाऊन येतो. त्यामुळेच आपण विखुरलेले आहोत.


हे किती छोटे कारण आहे विखुरण्याचे...असेच जर असेल तर चला देऊन बघुया...एक दिवस आठवड्याचा. जिथे असाल तिथल्या देवळात जा, जो पटेल त्या उपचाराने मनापासून नमस्कार तर करून पाहू. वाईट तर नक्कीच काही होणार नाही.


Meditation चे महत्त्व आता शास्त्राने/सायन्सने पण मान्य केले आहे.  आस्तिक माणसांना बरेच शारिरीक व मानसिक आजार होण्याचे प्रमाण कमी असते असे काही चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.  आपण लहानपणा पासून पिक्चर मध्ये ऐकत आलेलो आहोत, " अब इसे दवा की नही दुवा की जरूरत है!" यातला गंमतीचा भाग सोडला तरी हा मुद्दा अधोरेखित होतोच.


आता काही लोक युक्तीवाद करतात, नुसता देवधर्म करण्यापेक्षा काही समाज कार्य करा. उत्तम विचार आहे. सवंगडी जमवून ठराविक वारी देवळाचा परिसर स्वच्छ करा. एकही भिकारी देवळाच्या परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी भिकार्यांना करता येण्याजोगे सन्माननीय काम द्या जसे एखादी वस्तू विकणे. उदाहरणार्थ अगदी पेन, पेन्सिल, फुले, किंवा इतर साहित्य वगैरे व सुरुवातीचे भांडवल तुम्ही घाला. फार लागत नाही. शंभर रुपयात पण बरीच फुले येऊ शकतील जे विकून त्या गरीबाला भीक मागण्या पेक्षा  मानाची कमाई मिळवण्याचा मार्ग सापडेल. कुठे छोट्या मुलांना शिकवा. तुमचाच इतिहास , पुराणे वगैरे उजळणी करून नवीन पिढी कडे जाईल. हाती वेळ व उत्साह असेल तर प्रवचने, कीर्तने, व्याख्याने भरवा. अगदी लहान मुलांमध्ये देखील ह्या माध्यमातून एकाग्रता, वक्तृत्व इ. गुण विकसित व्हायला मदत होईल.


बरेचसे धर्म हे एक परिपूर्ण  संस्था रुपी काम करतात. जिथे ह्या ना त्या रुपात लोकसंग्रह, लोकविकास, व त्यातून सामाजिक विकास होत असतो. 


हे सगळे आपण  खूप पूर्वी पासून करत होतोच. आता त्यावर धूळ जमली आहे इतकेच. आपल्याला आपल्या सोईचा वार सुद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. सोई नुसार गर्दी चे वा बिनगर्दीचे देऊळ निवडण्याचे पण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणासाठी नाही, तर स्वतः साठीतरी, दहा मिनिटे असू दे वा दोन तास असू देत, आठवड्यातून एक दिवस कुठल्या ही एका देवळा साठी देऊन तर पहा!!!


सुवर्णा उपलप

17-Jan-2020



No comments:

Post a Comment

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

  हिंजवडी, कॅब आणि प्रवासी हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां...